आश्चर्य... ‘अभाविप’कडून मनुस्मृती दहन
रोहितची आत्महत्या, कन्हैयावर देशद्रोहाचा आरोप, आणि त्याही अगोदर एफटीआयमध्ये गजेंद्र चौहानच्या नियुक्तीवरुन विद्यार्थ्यांचे चिघळलेले आंदोलन यामुळे देशातील विद्यार्थी ‘असहिष्णूते’च्या वातावरणात वावरत आहेत, हे प्रकर्षाने अधोरेखीत झाले आहे. मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले तर नैराश्येची परिसीमा गाठल्यानंतर एखादी व्यक्ती आत्महत्येसाठी प्रवृत्त होते. फक्त प्रवृत्त होते; पण प्रत्यक्षात आत्महत्या करण्याची वेळ केव्हा येते? जेव्हा परिसीमाही आपली मर्यादा ओलांडते, तेव्हा एखादा आत्महत्या करतो. ही परिसीमा ओलंडण्यास एचआरडी मंत्रालयाने रोहितला प्रवृत्त केले; आणि या सर्वांच्या मुळाशी ‘अभाविप’ ठाण मांडून बसली होती. त्यामुळे खलनायकाच्या भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी ‘अभाविप’चा केविलवाना प्रयत्न महिलादिनी दिसून आला.
मुळात ज्या संघटनेवर राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे प्रभुत्व आहे, ती संघटना संघाच्या अजेंड्यापलिकडे जाऊन एखादे पाऊल उचलते, हे पचनी पडले नाही. महिलादिनी अखील भारतीय विद्यार्थी संघटनेने मनुस्मृतीचे ‘काही’ पाने जाळून ब्राम्हण्यवादाचा जाहिर निषेध केला. या कृतीतून नक्की त्यांना काय साध्य करायचे होते? हे मात्र अस्पष्टच राहिले. मनुस्मृतीची केवळ ४० पाने त्यांनी जाळली, म्हणजे इतर पानांवर जे काही लिहले आहे, त्याचे ते समर्थन तर करत नाहीत ना? असा प्रश्न येथे उपस्थित झाला आहे. सर्वप्रथम मनुस्मृतीचा उगम कोठून झाला, हे माहिती असणे गरजेचे आहे. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी युरेशियन वैदिक आर्यांनी येथील अनार्यांवर आक्रमन केले. ज्यांनी प्रतिकार केला, त्यांच्यावर अमानुष अटी लादल्या. जातींचा टॉवर उभा केला आणि अतिशय चतुराईने टॉवरला लिफ्टच बसवली नाही. मग जो ज्या मजल्यावर जन्मला, त्याने त्याच मजल्यावर मरावे, असा हुकूमच सोडला. ज्यांनी या व्यवस्थेला प्रखरतेने विरोध केला त्यांना बिल्डींगमधून लाथा-बुक्या मारुन हाकलले. पण पुन्हा विद्रोह नको म्हणून मनुने पीडित समाजावर अतिशय घाणेरडे आणि क्रुर नियम लादले. ते नियम म्हणजेचे मनुस्मृती. या मनुस्मृतीने पीडित वर्गांवर अमानुष अत्याचार केले. या अत्याचाराचे वर्णन करायचे झाले, तर अमानुष, क्रुर सारखे शब्दही तोकडे पडतील. हजारो वर्षांपासून मनुस्मृतीने बहुजनांच्या उरावर ‘तांडव’नृत्य केले. पण जसे सुर्याच्या पहिल्या किरणाने अंधकार नाहीसा होतो, तसे प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन करुन जातीव्यवस्थेलाच आव्हान दिले. तत्कालीन वेळी उच्चवर्णियांनी बाबासाहेबांच्या या कृतीचा विरोधच केला होता; पण ते न डळमळता लढले, आणि संविधानाने मनुस्मृतीला केव्हाच उन्मळून फेकून दिले. पण देशात मनुस्मृतीच्या पावलावर पाऊल टाकणारे आजही आहेत, हे कन्हैयाच्या प्रकरणावरुन दिसून आले. कन्हैयाने अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा उपयोग करत देशात चाललेल्या गंभीर प्रश्नांवर बोट ठेवले. रोहित वेमुला हा पीएचडीचा विद्यार्थी; त्याची फॉलोशीप थांबवली; एचआरडी मंत्रालयाने त्याच्याविरोधात हैदराबाद विद्यापीठ प्रशासनाला पत्र पाठवले; मग जेव्हा सरकारच तुमच्या विरोधात उभे राहते, तेव्हा या देशातील लेकरांनी जायचे कुठे? पाकिस्तानात? आहो... ते तर सीमेवरच गोळ्या झाडतील; कारण त्यांना माहित आहे की ही मुलं भारतीय आहेत! रोहित आत्महत्या प्रकरणाची झळ जेएनयूपर्यंत पोहचली. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला देशविरोधी घोषणा दिल्यामुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक केली; पण जेव्हा ही केस दिल्ली उच्च न्यायालयात गेली, सुनावनीवेळी न्यायालयानेच पोलिसांना फटकारले. देशद्रोहाचा अर्थ कळतो का? असाच खडा सवालच हायकोर्टाने पोलिसांना केला, आणि दुसर्या दिवशीच कन्हैयाची जामीनावर सुटका झाली. पण त्याच्या सुटकेने चवताळलेल्या भाजपाच्या एका युवा नेत्याने ‘कन्हैयाची जीभ कापणार्याला ५ लाखांचे बक्षीस’ अशी जाहिरातबाजी केली. योगायोगाने अस्पृश्यांनी संस्कृत वचन बोलले तर त्याची जीभ छाटावी, असा वटहूकुम मनुस्मृतीत उल्लेखीत आहे. म्हणजे आरएसएसची एक विंग मनुस्मृतीनूसार कन्हैयाची जीभ कापण्याचे फर्मान सोडतेय, तर दुसरी विंग महिलांबद्दल अपशब्द बाळगणार्या मनुस्मृतीचे दहन करतेय. हा विरोधाभास नव्हे का? आता देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका लागल्या आहेत. आणि भाजपाला आपली प्रतिमा स्वच्छ ठेवायाची आहे. रोहित वेमुलाची आत्महत्या, कन्हैयावर देशद्रोहाचा आरोप या दोघांचे पडसाद या निवडणुकीच्या निकालावर उमटणार आहेत, हे संघाने चांगले ओळखले आहे. सध्या कन्हैयाचा बोलबाला आहे. देशातील विद्यार्थ्यांसह सामान्य जनताही कन्हैयाच्या बाजूने आहे. त्यामुळे बहुजन समाजाला आपल्याकडे खेचण्याची राजनीती भाजपाला करावी लागणार आहे. त्याचीच सुरुवात मंगळवारी महिलादिनी दिसून आली. ‘अभाविप’ या संघाच्या एका विंगने मनुस्मृतीला विरोध करुन आम्हीही बहुजनांना गुलामीची वागणूक देणार्या मनुस्मृतीचा निषेध करतो, हा दाखविण्याचा केविलवाना प्रयत्न केला आहे.
Nice one
ReplyDeletethanku
Deletethanku
DeleteNice one
ReplyDelete