अवकाळी पावसाच्या ढगांनी आकाशात आपली जागा व्यापताच येथे जमीनीवर जणू चांदण्यांचा सडाच उतरतो. मान्सूनपूर्व पावसाची चाहूल लागताच काजव्यांची किरकिर रात्रभर सुरु राहते आणि निसर्गप्रेमींची पाऊले आपोआप भंडारदराच्या खोऱ्याच्या दिशेने पडू लागतात. भंडारदरामध्ये काजव्यांचा हा अनोखा चमत्कार पाहणे अलौकिकच असते. पर्यटकांना काजव्यांच्या या आश्चर्यचकित करणाऱ्या जैवप्रकाशाचे दर्शन घडविण्याची संधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) घडवून आणली आहे. भंडारदराच्या खोऱ्यांमध्ये सध्या काजवा महोत्सव सुरु असून हा महोत्सव आपल्या शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपला आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ इथे अधिकच वाढला आहे. गेल्या मे महिन्याच्या २० तारखेपासून सुरु झालेल्या या महोत्सवाची सांगता २० जून रोजी झाली.
‘काजवा’ हा काही आपल्यासाठी नवीन नाही. मग या काजवा महोत्सवात एवढे विशेष काय आहे की पर्यटकांची ही एकच गर्दी भंडारदरामध्ये होत आहे. हे पाहण्यासाठी स्वत: भंडारदराच्या खोऱ्यांमध्ये भटकंती केली आणि काजव्यांचा अविस्मरणीय देखावा पाहून नेत्र सुखावले. भंडारदरातील जंगलात जिथे नजर जाईल तिथे काजव्यांची लुकलुक दिसत होती. विशेष म्हणजे, या काजव्यांमध्ये कमालीचे समन्वय पहायवास मिळाले. कि्रकेट मैदानाच्या प्रेक्षक गॅलरीत क्रीडारसिक ज्याप्रमाणे खेळाडूंना आळीपाळीने दाद देतात, अगदी तसाच नजारा इथे पहावयास मिळत होता. एका झाडामागून एका झाडावरील काजव्यांचा जैवप्रकाश चमकत जात होता. हे पाहणे अविस्मरणीय. मुंबईपासून १८५ कि.मी. दूर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा येथे पर्यटकांसाठी अगणीत खजाना दडला आहे. नाशिक-अहमदनगर मार्गे आटगाव - कसारा बुद्रुक - इगतपूरी- शिर्डी सिन्नर घोटी मार्गे भंडारदराला आस्वाद घेण्यासाठी जाणे सोयीस्कर पडते.
‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटात शंकर महादेवन ‘मन मंदिरा’चा सूर छेडल्यानंतर जे काजव्यांचे दर्शन घडते, ते साक्षात येथे पहावयास मिळते. किंबहूना चित्रपटापेक्षाही कित्येक पटीने हे दर्शन विलोभनीय आहे. पण काजवे पाहण्यासाठी भंडारदराच का? हा प्रश्न वाचकांना पडणे साहजिकच आहे. कोकण आिण पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना काजवा काही नवीन नाही. एवढेच काय, विदर्भातही काजव्यांचा मेळा भरलेला काही ठिकाणी पहावयास मिळतो. परंतु, भंडारदराची बातच निराळी. इतर ठिकाणी तुरळक संख्येेने काजव्यांचे दर्शन घडते. तर भंडारदरात लाखों, कोटींच्या संख्येने काजव्यांचा सडा पडलेला दिसतो. येथे कजव्यांना पोषक असणाऱ्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काजव्यांची चादरच पसरलेली दिसून येते. खोऱ्यांचे भंडार असल्यामुळेच याला भंडारदार म्हटले गेले आिण खोऱ्यांत खेळती हवा नसल्या कारणामुळे काजव्यांना प्रजननासाठी ही जागा पोषक ठरते. येथे हिरडा, बेहड, सदडा अशी वनौषधी झाडांसह आंब्यांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत आणि या झाड्यांवरच काजवा टिकाव धरू शकातो. या झाडांची पानं ही काजव्यांचा अन्न असते. त्यामुळे भंडारदरात इतर ठिकाणांच्या तुलनेत काजव्यांचे प्रमाण कित्येक पटीने अधिक असते.
विद्युत दिव्यांची रोषणाई केल्यासमान प्रत्येक झाडांवर काजव्यांचा जैवप्रकाश मन मोहून जातो. मे महिन्याचा शेवटचा आठवडा आणि पावसाळा सुरु होण्यापूर्वीचे काही दिवस हा कालावधी काजव्यांचा प्रजननाचा काळ असतो. या दिवसांत काजवे मोठ्या संख्येने प्रजननासाठी बाहेर येतात. नर-मादीला आकर्षिक करण्यासाठी आपल्याजवळील नैसर्गिक प्रकाशाने ते एकमेकांना इशारे करतात. त्यांचा एकमेकांना आकर्षिक करण्याचा हा जो काही प्रयत्न असतो, तो अलौकिक असतो. हे पाहण्यासाठी दूरदूरुन पर्यटक भंडारदराच्या खोऱ्यांमध्ये भटकंती करतात आणि अगदी सहजच त्यांना जैवप्रकाशाची चादर टिमटिम करताना दिसून येते. पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने येथे चांगली सोय केली आहे. येथील काजव्यांची अफाट संख्या पाहता एमटीडीसीने पर्यटन विकासाच्या दृष्टीने येथे गेल्या चार वर्षापासून काजवा महोत्सव भरविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी येथील स्थानिकांशी हातमिळवणी करुन पर्यटनवृद्धीसाठी एमटीडीसीने एक पाऊल पुढे टाकले आहे. एमटीडीसीच्या या निर्णयाचा फायदा येथील स्थानिकांना मिळत आहे. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटला आहे. भंडारदरा आणि आजूबाजूच्या गावांमध्ये बहुतांशी आदिवासी वस्ती आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती म्हणावी तशी चांगली नाही. यांना प्रशिक्षण देऊन ‘गाईड’ म्हणून एमटीडीसीने सेवेत रुजू केले आहे. तर काहींना हॉटेल व्यवसाय टाकण्यासाठी परवानगी देखील दिली आहे. या काजवा महोत्सवाला येथील स्थानिक केशव खाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. किंबहुना त्यांच्यामुळेच हा महोत्सव येथे दरवर्षी भरतो. आजमतीस दरदिवशी सुमारे ४०० ते ६०० पर्यटक येथे भेटी देतात आणि या अलौकिक महोत्सवाचा आनंद घेतात. २० तारखेला हा महोत्सव संपत आहे. याचा अर्थ असा नव्हे की येथे काजव्यांचे दर्शन होणार नाही. जोपर्यंत मुसळधार पाऊस होत नाही, तोपर्यंत काजवे येथे लुकलुक करत राहणारच, यात शंका नाही. शिवाय खोल दऱ्या, मोठेधरण, सरोवर, धबधबे, एतिहासिक किल्ला व पुरातन मंदिर आहेच पर्यटकांना खुणवायला. त्यामुळे तुम्ही कधीही येथे जा, निसर्गाने तुमच्यासाठी नवीन काहीतरी वाढून ठेवले असेल, हे नक्कीच!