भारतात प्रत्येक राज्यांची आपली एक विशेष भाषाशैली आहे आणि त्या भाषेला स्वत:चा एक समृद्ध इतिहास आहे. मैलागणिक या भाषांच्या देहबोलीत बदल आढळतो. मुंबईत बोलणारी हिंदी आणि बिहारमधील हिंदी दोघांमध्ये बरीच तफावत आहे. साम्य केवळ ‘देवनागरी’. हिंदी, गुजराती, मराठी, भोजपूरी इत्यादी भाषा उच्चारताना वेगवेगळ्या भासत असल्या तरी त्यांची लिपी मात्र एकच आहे. ती म्हणजे ‘देवनागरी’. देवनागरी उत्तर भारतात वापरली जाते, तर द्रविडीनय लिपीचा दक्षिण भारतात वापर होतो. भारतात आज अनेक वैविध्यपूर्ण लिपी आहेत आणि या लिपींचा इतिहासही तितकाच रोचक आहे.
भारताला प्रचीन इतिहास लाभलेला आहे. येथे एकेकाळी ६४ लिपी अस्तित्वात होत्या, असा उल्लेख ललितविस्तार या बौद्ध ग्रंथात सापडतो. असे असले तरी उत्खननात केवळ दोन प्राचीन लिपींचे पुरावे सापडले आहेत. ‘खरोष्ठी’ आणि ‘ब्राम्ही’ या दोन लिपी उत्खननात आढळल्या. ऊर्दूप्रमाणे उलटे लिहले जाणाऱ्या ‘खरोष्ठी’ लिपीतील लेख कंदहार, अफगाणिस्तान, तक्षशिला, मान्सेरा, लडाख, तुर्कस्थान अशा ठिकाणी सापडले आहेत. परंतु, हिंदूकुश पर्वताच्या उत्तरेला या लिपीचा प्रसार झाल्याचे दिसत नाही. ब्राम्ही लिपीतील लेख मात्र आजही भारताच्या कानाकोपऱ्यात सापडतात. त्यामुळे भारतातील सर्वदूर लोकांना ही लिपी वाचता येत असावी, असा अंदाज आहे. जेथे ब्राम्ही लिपी वाचता येत नाही, तेथे खरोष्ठी लिपीचा वापर झाला असावा, पण खरोष्ठी लिपीचा विकास झाल्याचे आढळत नाही.‘ब्राम्ही’ लिपीचा उत्तरोत्तर विकास झाल्याचे पहावयास मिळते.
इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने कोरलेले शिलालेख आणि लेण्यांतील लेखांतून ‘ब्राम्ही’ आजही वाचता येऊ शकते. सम्राट अशोकपासून ते ग्रुप्ता कालखंडापर्यंत ‘ब्राम्ही’ वापरात असल्याचे पुरावे सापडतात. पाल साम्राज्य अर्थात इसवी सन सातव्या ते बाराव्या शतकापर्यंत ‘ब्राम्ही’ लिपी लिहली-कोरली जायची आणि त्यावेळच्या लोकांना ती वाचताही यायची. अर्थात सम्राट अशोकाच्या काळातील ‘ब्राम्ही’ आणि सातव्या-आठव्या शतकातील ‘ब्राम्ही’ यामध्ये अमुलाग्र बदल झालेले होते, परंतु, मूळ ढाचा तोच होता. पण बाराव्या शतकानंतर ही लिपी लोप पावली. इतका प्रदीर्घ इतिहास असतानाही त्यानंतर ‘ब्राम्ही’ कोणालाही वाचता येत नव्हती, हे भारताचे दुर्देवच म्हणवे. ब्रिटीश अभ्यासक जेम्स प्रिन्सेप यांच्या सात वर्षांच्या निरंतर परिश्रमानंतर ही लिपी पुन्हा प्रकाशात आली. या लिपीचे वाचन करण्यात त्यांना यश मिळाले. त्यामुळे भारताचा प्राचीन इतिहास मुख्यत्वे बौद्धकालीन इतिहास जगासमोर आला. जेम्स प्रिन्सेपपूर्वीही या लिपीचे वाचन करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तो यशस्वी झाला नाही. सोळाव्या शतकात दिल्लीचा बादशाह फिरोजशहा तुघलक यांनी मोठ्या परिश्रमाने ब्राम्ही शिलालेख असलेले स्तंभ पंबाजमधील टोपडा आणि मीरठ येथून दिल्लीला आणले. अनेक पंडितांनी हे शिलालेख वाचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना त्यात यश आले नाही. १८३७ च्या दरम्यान जेम्स प्रिन्सेप यांना हे लेख वाचण्यात यश आले. सर्वप्रथम ‘द’ आणि ‘न’ हे अक्षर त्यांनी ओळखले. त्यानंतर विस्कटलेली ‘अट्ठकडी’ उमजली. आज जेव्हा देवनागरी तसेच दक्षिण भारतातील लिपींच्या उगमस्थानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता उत्तर ‘ब्राम्ही’ हेच मिळते.
ब्राम्ही लिपीचा इतर लिपींवर प्रभाव कसा, हे समजायचे असेल तर त्यासाठी तुलनात्मक अभ्यास होणे गरजेचे आहे. ‘ब्राम्ही’मध्ये ‘न’ हा गणितातील ‘लंब’चे चिन्ह किंवा इंग्रजीतील उलटा ‘टी’ प्रमाणे लिहला जातो. देवनागरीमध्ये ‘न’ असा आहे. आता या दोघांमध्ये तुलना केली असता दिसून येते की, उलट्या ‘टी’मधील खालची दांडी मध्यभागी सरकल्यानंतर ‘देवनागरी’ लिपीतील ‘न’ अक्षर तयार झाले. अर्थात हा बदल क्षणात नव्हता झालेला नव्हता. कित्येक वर्षांच्या स्थितांतरांनंतर ‘ब्राम्ही’तून आजची ‘देवनागरी’ लिपी अस्तित्वात आली. ‘ब्राम्ही’मधील एक असेही अक्षर आहे जे जसेच्या तसे राहिले. ते म्हणजे ‘ढ’. ‘ब्राम्ही’च्या ‘ढ’मध्ये काहीच बदल न झाल्यामुळे आजही ज्याच्या बौद्धिक क्षमतेचा विकास होत नाही, त्यांना ‘ढ’ म्हणून उपहासात्मक डिवचले जाते. ‘देवनागरी’तील ‘द’ उलटा लिहल्यास तो ‘ब्राम्ही’चा ‘द’ होईल, अशी अनेक दाखले देता येतील.
प्रत्येक काळखंडातील ब्राम्हीमध्ये बदल होत गेल्याचे उत्खनानातून सापडलेल्या शिलास्तंभ, लेण्यांमधील कोरीव लेख, नाण्यांवरील लेख यावरून स्पष्ट होते. उत्तरेत जशी ‘देवनागरी’ विकसित झाली, तसेच पाचव्या शतकात दक्षिण भारतात ‘ब्राम्ही’तून ‘ग्रंथा’, ‘कडम्बा’ या दोन लिपी विकसित पावल्या. नंतर ‘ग्रंथा’मूधन ‘तामिळ, ‘मळ्यालम’ तर दहाव्या शतकातील ‘जुन्या कडम्बा’मधून ‘कनडा’ आणि ‘तेलगू’ लिपी अस्तित्वात आल्या. या लिपी हजार वर्षांपूर्वीच्या असून आजही वापरात आहेत. ‘ब्राम्ही’तील ‘ब’ हा चौकोन आकाराने दर्शवला जातो. तर चौकानातील वरच्या बाजुची रेघ मिटवली की तो बनतो ‘तामिळ’मधील ‘ब’. हे जे बदल होत गेले ते तत्कालीन काळखंड आणि राज्यांच्या प्रभावाचा परिणाम आहे.
चौथ्या ते पाचव्या शतकात गुप्त काळखंडात ‘ब्राम्ही’ वळणदार होती. आठवे शतक येईपर्यंत झाडाच्या सालीवर लिहण्याची कला अवगत झाली होती. त्यामुळे अक्षरावर रेघ आणि सुटसुटीत व निटनिटकेपणा तेव्हापासून रूढ झाला. ब्राम्हीमधूनच निर्माण झालेल्या ‘शारदा’ लिपीतून हे दिसून येते. तत्कालीन वेळी काश्मीरी खोऱ्यात या लिपीचा सर्रास वापर व्हायचा. शारदाप्रमाणे समांतर इतर लिपीही विकसित होत होत्या, त्यापैकी एक ‘नागरी’ लिपी होय. ताम्प्रपत्रावर लिहल्या जाणाऱ्या आठव्या शतकातील ‘नागरी’तूनच नंतर अनेक लिपींनी जन्म घेतला. ‘नंदी नागरी’, ‘लेट नागरी’, ‘आसामी’, ‘बंगाली’, ‘ओरीसा’, ‘गुजराती’, ‘गुरूमुखी’ या सर्व लिपी अकराव्या ते सोळाव्या शतकाच्या काळखंडात उदयास आल्या. या ‘नागरी’तूनच आपल्या ‘देवनागरी’ने जन्म घेतला आणि या सर्व लिपींचे उगमस्थान म्हणजे ‘ब्राम्ही’ होय. आज भारताची प्राचीन लिपी म्हणून ब्राम्हीला मान्यता आहे. पण त्यापूर्वीही लिखान होते, हे हडप्पा-मोहेन्जदाडो संस्कृतीत मिळालेल्या अवशेषांतून दिसून येते. परंतु, तेव्हा मिळालेले ‘इन्स्क्रीप्शन’ अद्याप कोणालाही वाचता आलेले नाहीत. पण संशोधन सुरू आहे. उत्खननाद्वारे मातीत दबून राहिलेले पुरावे बाहेर निघतील आणि तत्कालीन लिपीमधून लिहलेल्या लेखांद्वारे आणखी नवी संस्कृती प्रकाशात येईल.
Play Casino Site – Review & Welcome Bonus
ReplyDeleteLooking for a place to play casino games? The casino site has some good new players from some of the world's leading luckyclub providers. the first casino site