Tuesday, 14 February 2017

This Valentine Say....‘लिव्ह ईन’च्या बाधेपासून आम्ही दूरच

पूर्वी विद्यार्थ्यांची ओळख त्यांच्या गुणांवरुन व्हायची. खेळ, कला आणि शिक्षणामध्ये अव्वल असलेला कॉलेजचा हिरो असायचा. मात्र अलीकडच्या काळात ही परिभाषा बदलत गेली. हल्ली मुलींना फिरवणाऱ्याची कॉलेजमध्ये चलती असते. किंबहुना जो मुलींमध्ये जास्त परिचयाचा असतो, तोच त्या ग्रुपचा अॅडमीन असतो. येथे ग्रुप म्हणजे व्हॉट्सअॅप नव्हे बरं का! मित्रांच्या खऱ्याखुऱ्या ग्रुपचा तो म्होरक्या असतो. मुलींना पटविण्यासाठी त्याचा मार्गदर्शक सल्ला मोलाचा ठरतो. कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसांत ‘टाईमपास’ असलेली ‘ती’ जीवनसोबती कधी बनते, हे त्याचेच त्याला कळत नाही. पण अलीकडे रिलेशनशिप लाँग टाईम ठेवण्याचा ट्रेण्डच गायब होताना दिसत आहे. करण जोहरच्या चित्रपटांचा हा परिणाम आहे, असे म्हटले तरी वागवे ठरणार नाही.
अलीकडे प्रेमपटातून निराळेच ‘संबंध’ दाखविण्यात येत आहेत. किंबहूना आजच्या तरुण पिढीचे ते प्रतिबिंबच म्हणावे लागेल. पबमधील डान्स फ्लोअरवर मैत्री होते आणि त्याच रात्री प्रेमाचा ‘अंकूर’ही फुलतो. शहरात मुख्यत्व मेट्रो सिटीमध्ये मुलांमुलींमधील मित्रत्वाचे नाते प्रेमात रुपांतरीत होते, हे काही नवीन नाही. आता तर थेट ‘आय लव्ह यू’ पासून सुरुवात होते. प्रेमाच्या बाबतीत ग्रामीण भागानेही कात टाकली आहे. एकेकाळी ग्रामीण भागात फ्रेन्डशिप देते का? या प्रश्नावरुन प्रेमप्रकरणे फुलत होती. परंतु, येथीलही लाईफ फास्ट झाली आहे. नव्या दमाच्या दिग्दर्शकांच्या प्रेमपटांमुळे प्रभावित झालेला प्रत्येक तरुण ‘तिला’ कशी बाटलीत उतरवता येईल, यासाठी वेगवेगळे प्रयोग करताना दिसतो. यासाठी ‘त्याच्या’ पेक्षा त्याच्या मित्रांचाच जास्त वाटा असतो. तू हो बोलली नाहीस तर हा वैफल्यग्रस्त होईल... वगैरे, वगैरे. जसा शेतीचा हंगाम असतो, प्राण्यांचा प्रजनन काळ असतो, तसा या तरुणांचाही फेब्रुवारी महिना रोमान्सचा पिरियड असतो. ‘रोझ डे’पासून रोमान्सचा लेक्चर सुरु होतो आणि व्हेलेन्टाईन डे दिवशी समारोप. ‘व्हेलेन्टाईन डे’नंतर ती सध्या काय करते? अशी म्हणायची वेळ येऊ नये, यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. परंतु, खरी गंमत ‘प्रपोझ डे’ला उडते. काल गुलाबाचे फुल देऊन सिग्नल तर दिला खरा, पण आज प्रेमाच्या गाडीचा एक्सलेटर रेटायचा कसा? या विवंचनेतच कॉलेजची पायरी चढायची आणि हिंमत करुन एकद्याचे बोलून टाकायचे. बहुतांशी मुलगीही होच म्हणते आणि तिचा नकार असेल तरी तो होच आहे, ही आमच्या तरुण पिढीची श्रद्धा असल्यामुळे तिच्या नकारामुळे फारसा फरकही पडत नाही. ‘प्रयत्नांती परमेश्वर’ उक्तीप्रमाणे चिकाटी सोडायची नाही. आज नाही उद्या हो म्हणणारच; नाहीतर जाणार कोणाकडे? अशी प्रत्येक तरुणाची भावना असते. ‘तिच्या’ हो म्हणण्याच्या आशेवर तिसऱ्या दिवशी चॉकलेट देऊन पुन्हा तिला गटविण्याचा प्रयत्न सुरु हाेतो. तसे प्रत्येकाची वेगवेगळी ‘आयटम’ ठरलेली असते, त्यामुळे कोणीही एकमेकांच्यामध्ये लुडबुड करत नाही. फार फार तर मैति्रणी काय त्या मदत करतात, एवढेचं. पण मैत्रिणींची मदतच मोलाची ठरते. कारण हे मित्र साले स्वत:ची पोळी तळण्यासाठी टपलेलेच असतात आणि दुसरे म्हणजे एक मुलगी शिफारस करत असल्यामुळे ‘तिचे’ मन पलटण्यासाठी ते फार उपयोगी ठरते. ‘लोहा गरम’ झाल्यानंतर चौथ्या-पाचव्या दिवशी थोडासा खर्च करायचा आणि व्हेलंटाईन डे मग आपलाच की राव! या ‘कष्टा’ची जाणीव कदाचित गर्भ श्रीमंतांच्या मुलांना नसावी. त्यांचं काय, पार्टीमध्ये एखादी भेटली की ड्रिंक घेता घेता ‘सेट’ होते. दुसऱ्या दिवशी ‘तिची’ही उतरते आणि ‘त्याची’ही. काही वेळ त्यांचे हे रिलेशन खुप काळ चालते. प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते. मध्य असतो आणि शेवटही असतो. कोणतेही नातेसंबंध टिकविण्यासाठी या तीन पायऱ्या चढाव्याच लागतात. कॉलेजमध्ये हसण्या-खेळण्याच्या वयात झालेले प्रेम फुलत जाते. एलआयसीचे हप्ते भरल्यानंतर जशी पॉलिसी मॅच्युर होते, तसे प्रेमही प्रगल्भ होत जाते. शेवटचे वर्ष येईपर्यंत दोघांमध्येही सुसंवाद वाढलेला असतो. करिअरनंतर लग्नाच्या गोष्ठी ठरलेल्या असतात. त्यांनतर फॅमिली प्लॅनिंग आिण पुढील आयुष्य. असा या व्हेलंटाईनचा शेवट होतो़  निदान मध्यमवर्गीयांमध्येही हिच प्रथा सुरु आहे. कर्मधर्मसंयोगाने ‘लिव्ह ईन’ची बाधा सध्याच्या मध्यमवर्गीय तरुणांना झालेली नाही, हे पाहून नक्कीच आनंद होतो.

No comments:

Post a Comment